स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल

भयंकर दोष निर्माण करणार्‍या आजच्या शिक्षणपद्धतीच्या तुलनेत मनुष्याचे चारित्र्य घडवणारे शिक्षण देणे का आवश्यक आहे याविषयी स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचार आपण प्रस्तुत लेखात पाहूया.


स्वामी विवेकानंद


‘खरे शिक्षण कसे हवे ?’
१. `माणूस' निर्माण करणारे आणि चारित्र्य घडवणारे शिक्षण हवे !

‘आयुष्यभर आत्मसात न झालेला आणि मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला ज्ञानाचा भारा म्हणजे शिक्षण नव्हे ! आपले जीवन घडवणारे, `माणूस' निर्माण करणारे, चारित्र्य घडवणारे आणि चांगले विचार आत्मसात करण्यास शिकवणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही ४ - ५ चांगले विचार आत्मसात करून ते आपले जीवन आणि आचरण यांत उतरवलेत, तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणार्‍यापेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल !

२. `मनुष्य' निर्माण करण्यास सर्वथा अयशस्वी ठरलेले आणि भयंकर दोष निर्माण झालेले आजचे शिक्षण !

आपल्या देशाच्या आध्यात्मिक आणि भौतिक शिक्षणाचा भार आपण घेतला पाहिजे, हे तुमच्या ध्यानात येते का ? आज तुम्हाला मिळत असलेल्या शिक्षणात काही चांगल्या गोष्टी आहेत; पण त्यात एवढे भयंकर दोष आहेत की, त्यांच्यामुळे चांगल्या गोष्टी निरुपयोगी ठरत आहेत. पहिली गोष्ट अशी की, हे शिक्षण `मनुष्य' निर्माण करणारे नाही, ते सर्वस्वी अकरणात्मक आहे. अकरणात्मक शिक्षण वा निषेधप्रधान शिक्षण हे मृत्यूहून वाईट होय.’


मनुष्याने त्याच्यातील दुबळेपणा झटकून देण्यासाठी
स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले स्फूर्तीदायी विचार
१. जगातले पाप आणि दुष्टपणा यांविषयी हाकाटी पिटून जगाला आणखी दुबळे बनवू नका !

‘जगातले पाप आणि दुष्टपणा यांविषयी उगाच हाकाटी करू नका. उलट आपल्याला अजूनही जगात पाप दिसत आहे, याविषयी खंत वाटू द्या. आपल्याला चोहीकडे पापच दिसत आहे, याविषयी मनापासून वाईट वाटू द्या आणि तुम्ही जर या जगाला साहाय्य करू इच्छित असाल, तर त्याच्या नावाने बोटे मोडून त्याला दोष देत बसू नका. त्याला आणखी जास्त दुबळे करू नका; कारण पाप म्हणा कि दुःख म्हणा, सारे दुबळेपणामुळेच आहे. ‘आपण दुबळे आहोत, पापी आहोत’, असेच लहानपणापासून आपल्या कानी-कपाळी ओरडण्यात आले आहे. या असल्या शिकवणुकीमुळे जग दिवसेंदिवस अधिकाधिक दुबळे होत आहे.

२. माणसाला त्याच्या ठायी असलेल्या शक्तीचे स्मरण करून द्या !

कपाळावर हात ठेवून आपल्या दुर्बलतेविषयी सुस्कारे टाकत बसणे, हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही. दुर्बलता दूर करण्याचा उपाय आहे बळ आणि शक्ती. माणसात आधीचीच वसत असलेली शक्ती जागृत होईल, असे काहीतरी करा. त्याला तिचे स्मरण द्या, तिचे ज्ञान द्या.’

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......