आत्मविश्वास हीच गुरूकिल्ल

व्यक्तिमत्वाचा विकास करणे अनेकांना अवघड बाब वाटते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. समाजातील घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपण कमी पडल्याची भावना मनात निर्माण होते. त्यातून नैराश्य येते.

आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करता, त्यातून एक वेगळी उर्जा उत्त्पन्न होत असते. ही उर्जा तुमच्यातील आत्मविश्वासाची असते. हा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात.

लिटल मास्टर सचिन जेव्हा पाक विरोधात प्रथम मैदानावर उतरला. तेव्हा त्याच्यासोबत नवज्योत सिद्धू मैदानावर खेळत होता. सचिन जेमतेम 16 वर्षांचा असेल, पाकिस्तानी खेळाडूच काय तर सिद्धूलाही सचिनला पाहून हसू आले होते.

सचिनला पाकच्या गोलंदाजाने पहिलाच बाउंसर टाकला. सचिन जरासा चकला आणि स्वत:चे रक्षण करण्यासाठी तो खाली वाकला. सिद्धुला वाटले, काय खेळाडू पाठवलाय? याला खेळता मुळीच येणार नाही. त्याने सचिनकडे जाऊन त्याची विचारपूस केली आणि खेळू शकशील का? असे विचारले?

सचिन निश्चिंत होता. काहीच न बोलता त्याने मानेनेच होकार दिला. आणि दुसर्‍या चेंडूपासून पाक खेळाडूंना या 16 वर्षांच्या पोर्‍याने मैदानावर नुसते पळवले. याला म्हणतात आत्मविश्वास. हा प्रत्येकातच असतो असे नाही. सचिन शाळेतून तडक मैदानावर आला होता असे नाही, तर त्याच्या नियमित सरावाने त्याला नवा आत्मविश्वास मिळाला होता. याच बळावर आज जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून तो नावारुपाला आला आहे.

तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगही जिंकू शकता. परंतु तो आत्मविश्वास टिकवण्यासाठी तुमच्याकडे संयम असणे गरजेचे आहे.

विठ्ठल कामत हे नाव कदाचित तुम्ही ऐकले असेल. हो अगदी बरोबर, ज्या माणसाची शेकडो रेस्टॉरंट आहेत. पण हे विठ्ठल कामत एकदा आत्महत्या करण्याच्या तयारीत होते. पण एका पेंटरमुळे त्यांनी आपला निर्णय बदलला.

झाले असे. कामत आपल्या डोक्यावरच्या कर्जाने हैराण होते. त्यांना मार्गच दिसत नव्हता. तेव्हा ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेले होते. ते कार्यालय अत्यंत उंचावर होते. तो मात्र काही कामानिमित्त बाहेर गेला होता. तितक्यात त्याच्या खिडकीपाशी कामत गेले असता त्यांना एक क्षण त्या खिडकीतून ऊडी मारावी वाटली. परंतु, अचानक त्यांना समोर एका पेंटर तितक्याच उंचीवर काहीतरी रंगवत असल्याचे त्यांना दिसून आले. त्या पेंटरच्या हातात काहीच नव्हते. पडू नये म्हणून कशाचा आधारही त्याने घेतला नव्हता. परंतु तरीही तो त्याच्या कामात मग्न होता.

यावरून कामतांनी धडा घेतला. हा पेंटर आधाराशिवाय आत्मविश्वासाच्या बळावर जगू शकते तर मी का नाही? त्यांनी आपला विचार बदलला आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावरचे कर्ज तर उतरवलेच. परंतु, आज त्यांच्या क्षेत्रात त्यांचा कोणीही हात धरु शकत नाही.

कामत म्हणतात आपण आपल्या परिस्थितीकडे पाहून रडत असतो. परंतु, आपण इतरांची परिस्थिती पाहिली तर आपण किती सुखात आहोत याचा आपल्याला अंदाजा येईल. खरं आहे हे.

आणखी एक अशीच गोष्ट आहे. एकदा एका अपघातात एका व्यक्तीचा एक हात मोडला. त्याला प्रचंड दु:ख झाले. त्याला नैराश्य आले. तो काही काम करण्‍यास तयार होईना. त्याने घराबाहेर पडणेच बंद केले. यामुळे त्याचे कुटुंबीय रसत्यावर आले. त्यांचे हाल सुरू झाले. तरीही ती व्यक्ती काही केल्या आपली निराशा सोडत नव्हता. एके दिवशी त्याचे कुटुंबीय त्याला एका मंदिरात घेऊन गेले, तिथे एक मुलगा फुलं विकत होता. त्याला त्याची आई जेवू घालत होती. त्याला पाहून त्या व्यक्तीलाही हुरुप आला. जर बालपणापासून त्या मुलाचे दोन हात नसताना तो फुलं विकून आपले घर चालवू शकतो तर मग मी का नाही हा विचार करुन त्यानेही पुन्हा नव्या उमेदीने व्यापार सुरू केला.

असेच जेव्हा तुम्हाला आपले दु:ख जास्त असल्याचे जाणवेल त्यावेळी तुम्ही तुमच्यापेक्षा अधिक दु:खी असलेल्या एखाद्या व्यक्तीकडे पहा मग तुम्हाला जाणवेल, की त्यापेक्षा तुम्ही अधिक सुखात आहात. म्हणून आपला आत्मविश्वास गमावू देऊ नका.

काही झाले तरी केवळ तुम्ही याच बळावर यश खेचून आणू शकता. तुमचे व्यक्तीमत्व जर सुधारायचे असेल तर आधी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......